हजार वर्ष टिकणार असं अयोध्येत राम मंदिर उभारणार – गोविंद देवगिरी महाराज

0
197

पुणे, दि. ३1 (पीसीबी) : अयोध्येत हजार वर्ष टिकेल असं मंदिर उभं राहील असा विश्वास राम मंदिर उभारणी समितीचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी मंदिर उभारणासाठी एकूण ११०० कोटींचा खर्च येईल असा अंदाज व्यक्त केला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. “२०० फुटांपर्यंत फक्त रेती असून त्याठिकाणी हजार वर्ष टिकेल असं मंदिर उभारण्याचे याआधी प्रयत्न झाले पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पण आता मुंबई, गुवाहाटी, हैदराबाद येथील आयआयटी संस्थांच्या मदतीने तज्ञांची एक समिती नेमली असून त्यांनी दोन पर्याय दिले आहेत. त्यातील कोणता पर्याय निवडावा यासाठी दोन दिवस बैठक पार पडली. दगडांच्या आधारे हे मंदिर उभं राहील आणि हजार वर्ष टिकेल,” असं गोविंद देवगिरी महाराज यांनी म्हटलं आहे.

“आतल्या मंदिराचा खर्च किती असावा याबाबत न्यासाने कोणताही विचार केलेला नाही. पण कोषाध्यक्ष असल्याने मला खर्चाचा विचार करावा लागतो. माझ्या मते मुख्य मंदिराचा खर्च ३०० ते ४०० कोटी होईल. बाहेरील परिसरात होणाऱ्या विकासासोबत पकडल्यास हा खर्च ११०० कोटी होईल. हा फक्त माझा अंदाज आहे,” अशी माहिती गोविंद देवगिरी महाराज यांनी दिली.

राम मंदिर उभारणीचा सर्व खर्च करण्यासाठी एक उद्योगपती पुढे आला
“देशातील एका उद्योगपतीचा व्यक्ती माझ्याकडे येऊन मंदिर उभारणीसाठी येणार सर्व खर्च करण्यास तयार असल्याचं सांगितलं. मी त्यांच्याकडे नाव लावायचं आहे की नाही याची चौकशीही केली नाही. नाव लावायचं असेल तर प्रश्नच मिटला आणि लावायचं नसेल तर काही भाग तुम्ही देऊ शकता असं मी त्यांना सांगितलं. सामान्यातील सामन्यांचा निधी तिथे लागला पाहिजे अशी आमची भूमिका आहे,” अशी माहिती गोविंद देवगिरी महाराज यांनी यावेळी दिली.