मुंबई, दि. १६ (पीसीबी) – जुलमी सत्तेच्या विरोधात करण्यात येते, ते बंड असते, पण सत्तेच्या गोटात जाण्यासाठी होते, ती फक्त फितुरी असते. स्वातंत्र्यानंतर सर्व संस्थाने खालसा झाली असून आता कोणीही राजे राहिले नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.
मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या भाजप प्रवेशावर जोरदार टीकास्त्र सोडले.
कोल्हे म्हणाले की, जनतेच्या विकासासाठी पक्षांतर करत आहे, असे जेव्हा एखादा नेता म्हणतो, तेव्हा जनता स्वतःची कातडी बचावण्यासाठी असेच वाचते, कारण जनता आता दुधखुळी राहिलेली नाही. ज्या सरकारच्या पाच वर्षांच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या सरकारमध्ये जाऊन कोणता विकास साधायचा आहे? असा सवाल कोल्हे यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर केला.
गड किल्ले विकायला काढण्याचा निर्णय घेतल्यावर पर्यटन मंत्र्यांनी मलाच तुम्हाला कोणाच्या लग्नाला जायचे आहे, असा प्रश्न विचारल्याचे कोल्हे यांनी सांगितलले. या सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमान विकायला काढण्याचे काम केले आहे, असा प्रहार अमोल कोल्हे यांनी केला.