स्वतःच्या राजकारणासाठी फडणवीस आणि महाजन यांनी मला तिकीट मिळू दिल नाही – एकनाथ खडसे

0
597

मुंबई,दि.२(पीसीबी) – स्वतःच्या राजकारणासाठी फडणवीस आणि महाजन यांनी मला तिकीट मिळू दिल नाही. त्यामुळेच माझं तिकीट कापण्यात आलं, असा गौप्यस्फोट भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे यांनी पक्षाच्या राज्यातील नेतृत्वावर अनेक आरोप केले आहेत.

आतापर्यंत नाव न घेता टीका करणारे भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे नाव घेत टीका केली आहे. एकनाथ खडसे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपाच्या आजच्या स्थितीला राज्यातील नेतृत्वाला जबाबदार धरले आहे.

“भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीस यांनी आपल्याविषयी नाराजी व्यक्त केली. फडणवीस आणि महाजन यांनी मला तिकीट देण्यास पक्षश्रेष्ठींकडे विरोध केला. त्यावर आम्ही विचार करून निर्णय घेऊ असं पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं होतं. पण, तिकीट कापण्यात आलं. कोअर कमिटीमधील आपल्या जवळच्या मित्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्याला माहिती दिली,” असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे.

आपल्याला तिकीट न दिल्यानं माझ्यासह अजून दहा बारा जागांचं नुकसान पक्षाला सोसावं लागलं. एखाद दुसऱ्या व्यक्तीच्या हट्टापाई पक्षाचं नुकसान झाल्याचं सांगत खडसे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.