सुशांतसिंह राजपूत मृत्यू, खरे कारण…

0
447

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतू सुशांतसिंह राजपूतची हत्या झाल्याचे कोणतेच पुरावे मिळालेले नसल्याची माहिती सेंट्रल फॉरेंसिक सायन्स लॅब (CFSL) मधील सूत्रांनी दिली असल्याची माहिती आहे.
सीएफएसएलने सुशांतच्या राहत्या घरी क्राईम सीनचे रिक्रिएशन केलं होतं. त्यामध्ये सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाला असल्याचं समोर आलं आहे. सीएफएसएलने आपला हा अहवाल सीबीआयला सुपूर्त केला आहे. या अहवालाला सीबीआयकडून लवकरच अधिकृत दुजोरा येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणावर गेले तीन महिने राजकारण पेटले आहे. भाजप विरोधात अन्य राजकीय पक्ष तसेच बॉलिवूडमधील रथीमहारथींनी आरोप प्रत्यारोप केले. ड्रग्ज माफिया आणि बॉलिवूडचे संबंध कसे आहेत, त्यात कोण कोण अडकले याची खमंग चर्चा सुरू झाली. बिहारचे राजकारण या विषयावर कसे सुरू आहे त्याचे विश्लेषण झाले. मोदी समर्थक आणि विरोधक अशीही काही माध्यमांचीही या निमित्ताने वाटणी झाली. मूळ सुशांतसिंह आत्महत्या नव्हेच तर खून आहे, असा आरोप भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या सारख्या जबाबदार नेत्याने केल्याने खळभळ होती. सुशांतच्या मॅनेजरचीही आत्महत्या नाही तर खून असल्याचा शोध राणे यांनी लावला होता म्हणून आणखी गूढ वाढले होते. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे अशीही चर्चा रंगली होती. केंद्र सरकार आता या निमित्ताने शिवसेनेवर सूड उगवणार अशी अटकळ बांधण्यात आली होती. प्रत्यक्षात तपासात आत्महत्याच असल्याचे उघड झाल्याने सर्व हवेतले इमले कोसळले आहेत.