सरकार कोणाचेही असो सरकारला वाकवून विकास काम करण्याची हिंमत माझ्यात आहे – आमदार विश्वजीत कदम

0
774

कडेगाव, दि. ८ (पीसीबी) – मतदारसंघातल्या जनतेच्या सुख-दु:खात कदम कुटुंब कायम सोबत आहे. त्यामुळे मनात कोणतीही शंका ठेवू नका. सरकार कोणाचेही असो सरकारला वाकवून विकास काम करण्याची हिंमत माझ्यात आहे, असे काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि कडेगाव-पलूसचे आमदार विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे. ते सागरेश्वर सूत गिरणीच्या कार्यस्थळावर कार्यकत्यांशी संवाद साधताना बोलत होते.

मतदानाची आकडेवारी पाहिली तर निवडणुकीत पलूसच्या मानाने कडेगावमध्ये मतदानाची टक्केवारी कमी आहे. त्याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी ठरवले आहे की २०१४ पेक्षा जास्त मतदान मिळवायचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

पतंगराव कदम साहेब आणि मोहनराव कदमांनी जो विकासकामांचा डोंगर उभा केला आहे, त्याची पोचपावती या निवडणुकीत निश्चित मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तीन वेळा आलेल्या पुरात पतंगराव कदम साहेबांनी लोकांना सर्वोतोपरी मदत केली. सिंचन योजनांच्या माध्यमातून कडेगाव सारख्या दुष्काळी तालुक्याच त्यांनी नंदनवन केले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.