मुंबई, दि. ४ (पीसीबी) – शौर्य कोणी दाखवले, त्याग कोणी केला आणि आता छाती कोण फुगवून दाखवत आहे? असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला. सत्तेचा गैरवापर करूनच सत्ता राखायची, हे भाजप सरकारचे धोरण आहे, अशीही टीका त्यांनी केली.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, देशाचा मूड बदलला आहे, हे मोदींना समजले आहे. त्यामुळे त्यांनी हवाई हल्ल्याचे आणि जवानांनी दाखवलेल्या शौर्याचेही राजकारण करण्यास सुरुवात केली आहे, असा निशाणा पवार यांनी साधला आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्ये भाजपाने गमावली. तेव्हा मोदींना देशाचा मूड काय ते समजले. त्यामुळेच त्यांनी आता लष्करी कारवाईचेही राजकारण करण्यास सुरुवात केली आहे, अशी टीका पवार यांनी केली.
पाकिस्तानवर हवाई हल्ला करून देशाने पुलवामा हल्ल्याला उत्तर दिले आहे. मात्र, या सगळ्याचे राजकारण होत आहे, ही बाब दुर्दैवी आहे. सध्याचे सरकार जवानांच्या शौर्याचेही राजकारण करण्यात धन्यता मानत आहे, असाही टोला पवारांनी लगावला.