शिवसेनेने भाजपसोबतचा संसार आधी नीट करावा – नवाब मलिक   

0
874

मुंबई, दि. १ (पीसीबी) – शिवसेनेचा भाजपसोबत सुरू असलेला  संसार धड चालत नाही. अहमदनगरमध्ये ज्यांनी पक्षाचा आदेश पाळला नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईलच. मात्र  शिवसेनेने भाजपासोबतचा संसार कसा नीट चालेल, हे आधी बघावे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेवर केली आहे.

अहमदनगरमध्ये सर्व भाजप विरोधी पक्षांना एकत्र घेत आघाडी करण्यासाठी आमचे प्रयत्न होते . राष्ट्रवादी काँग्रेसचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. विधनासभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच राष्ट्रवादीने भाजपला पाठींबा दिला होता. त्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडल्यावर ते भाजपशी आघाडी करण्याची भीती वाटत होती, असा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला होता.

या आरोपांना  प्रत्युत्तर देताना मलिक यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा भाजपसोबतचा संसार नीट चालेल की घटस्फोट होणार, याचेही उत्तर जनतेला हवे आहे, असेही मलिक म्हणाले.