शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे बंड! शहर शिवसेनेत अस्वस्थता

0
185

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार संकटात आले आहे. शिंदे यांनी शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. या बंडामुळे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये सन्नाटा आहे. सरकार राहणार की जाणार याची चिंता पदाधिका-यांना आहे. तर, दुसरीकडे शहर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे धक्के राज्यातील सर्वच जिल्ह्यात बसले आहेत. पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघापैकी शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे बंडाचा परिणाम पुणे जिल्ह्यावर झाला नाही. पण, शिवसैनिकांमध्ये शांततेचे वातावरण आहे. कोणीही यावर बोलत नाही. सर्वांनी मौन पाळले आहे. सर्वांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड थंड करुन येण्यासाठी शिवसेनेचे नेते प्रयत्न करत आहेत. पण, आत्तापर्यंत शिंदे यांचे मन वळविण्यात यश आल्याचे दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारही डळमळीत आले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोंडीचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने चालला असल्याचे ट्विट केले आहे. त्यामुळे विधानसभा बरखास्त होईल किंवा शिंदे गटाच्या सहकार्याने भाजप सरकार स्थापन करेल अशी शक्यता आहे.

राज्यातील या घडामोंडीमुळे शहर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये शांतता आहे. सरकार पडल्यास महापालिका निवडणुकीला आपले कसे होईल, पुन्हा निवडून येणे शक्य होईल का की पक्षांतर करावे लागेल याची चिंता या पदाधिका-यांना सतावत आहे. तर, राज्यातील या घडामोडी पाहता पुन्हा भाजपचे सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपचा पाठीबा असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे काही लोक शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप सरकार स्थापन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शहर भाजपमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे.