शिंदे सरकार कोसळणारच

0
244

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी शिंदे सरकारबाबत मोठं वक्तव्य केलं. 16 आमदार अपात्र व्हायला हवेत. यामध्ये आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही नाव आहे. जर ते अपात्र झाले तर मग सरकारचं कोसळेल, असं उल्हास बापट म्हणालेत.

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी शिवाजी पार्क मैदानावर कोण दसरा मेळावा घेणार याचा फैसला काल उच्च न्ययालयाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला. यानंतर राज्यभर शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. आता 27 तारखेकडे होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावर उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिलीये.
टिव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उल्हास बापट बोलत होते. उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्याबाबत दिलेला निर्णय कायद्याला धरून असल्याचं देखील बापट यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, जर शिंदे गटानं कोर्टात जरी याचिका दाखल केली तरी हायकोर्टाचं निरीक्षण नोंदवलं जातं. कधीकधी हायकोर्टाचे निर्णय सुप्रीम कोर्ट फिरवतं मात्र कालचा निर्णय घटनेला धरून आहे, असंही बापट यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आठवड्यापूर्वी एका जाहीर सभेत शिंदे सरकार कोसळणारच असे ठाम विधान केले होते. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तेच म्हटले. कॉँग्रेसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटालो यांच्यासह बहुतांश भाजपा विरोधी नेत्यांनी असेच भाकीत केले आहे. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी मावळ तालुक्यातील आंदोलनात बोलताना, हे खोके सरकार कोसळणारच, असे पुन्हा पुन्हा म्हटले आहे. राज्य सरकार जाण्याच्या भितीपोटी गेले महिनाभर पालकमंत्री पदाचे वाटप झालेले नव्हते, परंतु विरोधकांनी टीकेचा भडिमार सुरू केल्यावर शनिवारी ती नावे जाहीर करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चार दिवसांची दिल्लीतील भाजपा नेत्यांशी भेट ही राज्याच्या प्रश्नावर नव्हे तर सरकार वाचविण्यासाठी होती, असेही आता समोर आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि एकनाथ खडसे यांनी अमित शाह यांना भेटण्याच्या बातम्यासुध्दा बरेच काही सांगून जात आहेत.