“शरद पवार यांना शहरी नक्षलवाद्यांना वाचवायचं आहे. त्यासाठी हा आटापिटा चालला आहे”

0
657

मुंबई,दि.२४(पीसीबी) – “शरद पवार यांना शहरी नक्षलवाद्यांना वाचवायचं आहे. त्यासाठी हा आटापिटा चालला आहे. एखाद्या गुन्हेगाराला वाचवण्याच्या नादात आपण जीव धोक्यात टाकून काम करणाऱ्या पोलिसांवर अविश्वास दाखवतो. त्यांचं मनोबल आपण तोडतो. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार गृहमंत्री देखील राहिले आहेत. त्यांनी अशाप्रकारचं राजकारण करुन पोलिसांचं मनोबल तोडणं हे अतिशय दुर्दैवी आहे. किमान शरद पवारांकडून ही अपेक्षा नाही.” अशी प्रतिक्रिया भाजप नेते विनोद तावडे यांनी दिली आहे.

कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्यानंतर भाजपचे नेते विनोद तावडे यांनी शरद पवारांना नक्षलवाद्यांना वाचवायचं असल्याचा आरोप केला आहे.

शरद पवार यांच्या पत्राची दखल घेऊन कारवाई करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षाचे आमदार दीपक केसरकर यांना बोलवून विचारणा करावी. केसरकरांनी पाहिलेले पुरावे उद्धव ठाकरेंनीही पाहावेत आणि नंतर कारवाई करावी. आपल्या पोलिसांवर अविश्वास दाखवू नका, अशी शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे. तेच बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरे करतील, असंही विनोद तावडेंनी नमूद केलं.