शरद पवारांना काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही – मुख्यमंत्री

0
655

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – काँग्रेस पक्षाला  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचासारखा मोठा वकील मिळाला आहे. त्यांना काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) येथे लगावला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जर कोण मान्य करत नसेल तर त्यांनी नेता म्हणवून घेऊ नये, असे फडणवीस  म्हणाले. 

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे तुम्ही त्यांनाच विचारा, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. आगामी काळात निवडणूक आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात लढवणार असल्याचे  त्यांनी स्पष्ट केले.

ख्रिश्चिअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील महत्वाचा माणूस आहे. या घोटाळ्याचा थेट लाभ काँग्रेस पक्षाला झाला आहे. ईडीने हीच गोष्ट न्यायालयासमोर सांगितली आहे. त्यामुळे आता काँग्रेसने आणि गांधी कुटुंबाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. इटालिअन न्यायालयाने ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी जे निर्णय दिले आहेत. त्यामध्ये चार वेळा सोनिया गांधींचे नाव आले आहे. त्यामुळे हे जे पुरावे समोर आले आहेत, त्यावर काँग्रेसने उत्तर दिले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

या  व्हीव्हीआयपी  हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी मिशेलने आपल्या एजन्सीसमोर  न्यायालयासमोर खुलासे केले आहेत.  त्यामध्ये सोनिया गांधी यांचे नाव आहे. यामध्ये इटालिअन लेडी त्यांचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतो, असा उल्लेख करण्यात आला आहे.  यावरुन  गांधी कुटुंबाचा  या घोटाळ्यात समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.