“व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी जीवनमूल्यांची जोपासना महत्त्वाची”

0
319

गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन आयोजित व्हर्चुअल मुलाखतीत मा. नितीनजी गडकरी यांचे प्रतिपादन!

ठाणे, दि.२१ (पीसीबी) : “आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, त्वरित निर्णयक्षमता, उद्यमशीलता या गोष्टी आवश्यक आहेतच पण त्याबरोबरच खरं बोलणे, फसवणूक न करणे, ज्येष्ठांचा आदर, शालीनता, सहजता, पारदर्शिता, मानवता, गुणग्राहकता आणि स्वीकारशीलता ही चिरंतन जीवनमूल्ये जोपासणे व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.” असे उद्गार मा. नितीनजी गडकरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले. या संस्थेच्या वतीने मंत्री महोदयांची व्हर्च्युअल मुलाखत घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सर्वांसाठी शिक्षण हे संस्थेचे ध्येय आहे. गरीब आणि वंचित कुटुंबातील विशेषतः ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थी विद्यार्थिनींना आर्थिक मदती बरोबरच सर्व प्रकारचे सहकार्य आणि मार्गदर्शन ही संस्था करते. संख्यात्मक विकासापेक्षा गुणात्मक विकास, सर्वसमावेशकता, करिअरबाबत मार्गदर्शन, दातृत्वाची साखळी आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास ही या संस्थेची मूलतत्त्वे आहेत. आजपर्यंत असंख्य विद्यार्थ्यांना या संस्थेने मदत केली असून त्यातील अनेक विद्यार्थी आता उच्चपदस्थ आहेत.

कार्यक्रमाचा प्रारंभ रुचिका गिरडे व प्रियंका वंजारी यांनी गायलेल्या स्वागत गीताने झाला. याची रचना मुकुंदराज कुलकर्णी यांची तर संगीत संयोजन डॉ. अश्विन जावडेकर यांचे होते. मा. मंत्रीमहोदयांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देणारी व्हिडिओ क्लिप दाखवल्यानंतर गुरुजी फाऊंडेशनच्या मानवतावादी कार्याची माहिती फाउंडेशनचे विद्यार्थी विश्वा शेट्टी आणि गायत्री चिंगुरडे यांनी दिली. मुलाखत घेण्याचे काम मुकुंदराज कुलकर्णी, निमिषा दळवी आणि रिद्धी पागे यांनी केले. रवींद्र राठोड आणि कृष्णामाईची थिटे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रतिक्षा घरत आणि स्नेहल घोडके यांनी केले. तांत्रिक बाजू आदित्य कुलथे, शुभम लिंगायत आणि आर्यन दैव यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे संस्थापक डॉ प्रदीप वायचळ(मूळ गाव सोलापूर), हर्शिता गोयल, मोहन वराडकर, अविनाश सुर्वे इत्यादी मान्यवरांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम यूट्यूब वरही उपलब्ध आहे आहे.