पुणे, दि. ३१ (पीसीबी) – सध्या देशात आर्थिक मंदीची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र, केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण जगभरातच सध्या मंदी सुरू आहे. त्याचा सरकारशी काहीच संबंध नाही आणि हे सुशिक्षित वर्गाला चांगले समजते. त्यामुळे महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीवर आर्थिक मंदीचा परिणाम होणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
पाटील म्हणाले की, मंदीतून भाजप सरकार मार्ग काढू शकेल, असा विश्वासही सुशिक्षित वर्गाला आहे. भाजपमध्ये प्रवेशासाठी रांग असून कोणत्याही आश्वासनाशिवाय आणि पार्श्वभूमी तपासूनच प्रवेश देण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाने भाजप-शिवसेना युतीला फायदा होण्याच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
उदयनराजे राजे असल्याने त्यांची पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची इच्छा असल्यास ती देखील पूर्ण करू, असे पाटील यांनी उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का ? या प्रश्नावर उत्तर दिले.