नाशिक, दि. १ (पीसीबी) – वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसमध्ये सामील व्हावे, अन्यथा आमचंही आणि तुमचंही नुकसान होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसमध्ये सामील होण्याचे आवाहन केले.
लोकसभा निवडणुकीत वंचितला बरोबर न घेतल्याने काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. त्यामुळे वंचितने काँग्रेस सोबत यावे, अन्यथा आमचंही नुकसान होईल आणि तुमचंही, असा सल्ला चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे.
दरम्यान, येत्या आठवडाभरात विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले. तसेच काँग्रेसकडून नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी राज्यात काँग्रेसचे उमेदवार असलेल्या ठिकाणी मेळावा घेण्यात येणार आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.