रोड इंजिनिअरिंगच्या चुकांमुळेच रस्त्यांवर मृत्यू- गडकरी

0
540

नागपूर, दि. २३ (पीसीबी) – देशात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे तयार केले जात आहे. मात्र, ज्या ‘डीपीआर’ (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) नुसार हे रस्ते केले जात आहेत, त्या डीपीआरमध्येच प्रचंड चुका असतात. घरी बसून अभियंते डीपीआर तयार करतात, अशा शब्दांत कानउघाडणी करत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रोड इंजिनिअरिंगच्या चुकांमुळेच रस्त्यांवर मृत्यू होत असल्याचे विधान केले. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आले.

नागपुरात चौथ्यांदा होत असलेल्या या अधिवेशनात देश-विदेशातील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी स्मरणिका आणि आयआरसीच्या विविध जर्नल्स व कोड सलग्नित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. रोड इंजिनिअरिंगमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असतात. वळण बरोबर न घेणे, झाडांच्या फांद्या वाहतुकीच्या आड येणे यांसारखे अनेक दोष यात आढळून येतात. रस्ते सुरक्षा या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. उच्च न्यायालयानंही याची दखल घेतली आहे. ३ लाख लोक या रस्ते अपघातामुळे दिव्यांग झाल्याचं वास्तव आहे. अपघात सापडलेल्या ५० टक्के लोकांचे जीव वाचविण्यात आपल्याला अपयश आलं. एकाच जागी शेकडो अपघात होतात, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.