जामनेर, दि. २१ (पीसीबी) – सत्तेचा गैरवापर करुन जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे. आता तुमचे थोडेच दिवस आहे. आम्ही सत्तेत येऊ तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल. मग तुमचे कसे होईल बघा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
मुंडे जामनेर येथील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित सभेत बोलत होते.
यावेळी मुंडे म्हणले की, जामनेर नगरपालिकेचा निकाल खरंतर लोकशाहीचा पराभव होता. ती लढाई होती धनशक्ती विरोधात जनशक्ती. पैसा, इव्हीएम घोटाळा हे समीकरण जुळवून आणले होते. झोळ्यामधून पैसे जमा करणाऱ्या पक्षाच्या येथील मंत्र्यांकडे एका मताला हजारो रूपये मोजण्याची ऐपत कुठून आली? असा सवाल मुंडे यांनी केला.
येथील स्थानिक मंत्र्यांनी वाचाळता केली, बारामती जिंकून दाखवेन. नखाची तरी सर आहे का? जामनेरचे एक गाव तरी आदर्श करून दाखववा. अहो, जामनेरकरांना साधं पिण्याच पाणी सुद्धा देऊ शकत नाही तुम्ही. काहीही करा, पण बारामतीचा नाद करू नका, असा इशारा मुंडे यांनी यावेळी दिला.