राष्ट्रपती राजवट लागावी ही भाजपाची इच्छा – राष्ट्रवादीचे प्रदशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांचा गंभीर आरोप

0
663

मुंबई, दि. २९ (पीसीबी) : राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीवरुन भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी असंच वाटत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्राचाही उल्लेख करत त्यात भाजपचा सूर स्पष्ट होत असल्याचं मत व्यक्त केलं.

जयंत पाटील म्हणाले, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे पत्र दिलं आहे त्यातून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी असाच सूर निघतो आहे. हा सूर त्यांचा आणि त्यांचा पक्ष भाजपचा आहे. मात्र, माझ्या दृष्टीने या मुद्द्यांमध्ये अर्थ नाही. राज्यपाल त्यांच्या सुचनेनुसार, विनंतीनुसार आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागतात, असं आमचं अजूनही मत नाही. राज्यपाल स्वतंत्र विचाराचे आहेत. ते निर्भिड आहेत. ते या प्रकरणी निर्भिडपणे निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे. कायदा आणि घटना जे सांगते त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने एकदा नाही, तर दोन-दोनवेळा शिफारस केल्यावर ती राज्यपालांनी मान्य करणे हे घटनेच्या चौकटीत बसतं म्हणून आम्ही ती मागणी करतो.”

जयंत पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “कोणत्याही राष्ट्रपतींना, राज्यपालांना संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊन राष्ट्रपती राजवट लावण्याचा अधिकार नाही. ‘आधी संकट कोरोनाचे, मग मुख्यमंत्रिपदाचे’ असं असायला हवं. आधी आपल्याला कोरोनाच्या संकटावर मात करायची आहे. रेशन कार्ड नाही त्यांच्या धान्याचं काय? निराधार योजनेत 1 हजार रुपये आले नाही त्या अनुदानाचं काय? ज्यांचा रोजगार गेला त्यांचं काय? कोट्यातून विद्यार्थ्यांना आणतो तेव्हा तेंलगणातील मजूरांचं काय, राज्यातील उद्योगधंदे बंद पडले आहेत त्याबद्दल चर्चा नाही. मात्र, आघाडीचे अनेक नेते 28 मे दूर असतानाही केवळ उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदावरच बोलत आहेत.”
सध्या कॅबिनेटची बैठक जनहिताचे निर्णय घेण्यासाठी होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा निर्णय 20 मेनंतर करता येईल, पण महाविकास आघाडी ज्या पद्धतीने राजकारण करत आहे ते चुकीचं आहे. खुर्ची, पद श्रेष्ठ नाही, या संकटावर मात करण्यासाठी एकमेकांशी चर्चा केली पाहिजे. हे संकट एका पक्षावर किंवा जाती धर्मावर नाही. हे संकट छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर आहे. मात्र, जयंत पाटील राष्ट्रपती राजवटीचा आरोप करत आहे. मला वाटतं राष्ट्रपती राजवट कुणाच्या हाती नाही. या देशात कायद्याच्या चौकटीबाहेर कुणीही जाऊ शकत नाही, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.