नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानाचे नाव बदलून, अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव उत्तर दिल्ली महापालिकेतील भाजपच्या ५ नगरसेवकांनी दिला आहे. या प्रस्तावावरुन राजकीय टीकाटिप्पणी होऊ लागली आहे.
यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला टोला लगावला आहे. भाजपला पंतप्रधान मोदींचेच नाव बदलण्याची गरज आहे, तरच त्यांना आता मते मिळतील, असे केजरीवाल यांनी ट्विट केले आहे.
रामलीला मैदानाचे नांव बदलून अटलजींचे नाव दिल्याने मते पडणार नाहीत. तर भाजपला पंतप्रधान मोदी यांचे नाव बदलावे लागेल. तेव्हा कुठे मते मिळतील. कारण त्यांच्या नावे तर लोक आत मते देत नाहीत, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.
दरम्यान, आप खोटा प्रचार करत आहे. भगवान राम आम्हा सर्वांसाठी आराध्य आहेत. त्यामुळे रामलीला मैदानाचे नाव बदलण्याचा प्रश्नच नाही, असे दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटले आहे.