राज्य सरकार करणार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी

0
617

मुंबई, दि.३१ (पीसीबी) – राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करणार आहे. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरु होईल आणि करोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.

पवार म्हणाले,राज्यातील दूधव्यवसाय, दूध उत्पादक शेतकरी संकटात आहे. दूध विक्री घटल्यामुळे गावागावात दूध स्वीकारले जात नाही. राज्यात उत्पादित १२ लाख लिटर दुधापैकी १० लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. खाजगी बाजारात दूधाचा दर १५ ते १७ रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरला आहे.
शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे. या शेतकऱ्यांना दिलासा, आधार देण्यासाठी तसेच करोनाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी राज्यात अतिरिक्त ठरत असलेले १० लाख लिटर दूध दूध संस्थांच्या माध्यमातून शासन २५ रुपये प्रतिलिटर दराने खेरदी करेल. त्या दुधाची भूकटी करुन ती साठवली जाईल, नंतर त्याची ऑनलाईन विक्री केली जाईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना आधार व दिलासा मिळेल. यासाठी साधारणपणे २०० कोटी रुपयांचा निधी लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.