विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई ऐवजी अनोख्या पद्धतीने केले प्रबोधन

0
503

 

पंढरपूर, दि.३१ (पीसीबी) – यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात लॉकडाऊन केले आहे. मात्र, तरीही विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई ऐवजी अनोख्या पद्धतीने प्रबोधन केले.दुचाकीस्वारांच्या कपाळाला बुक्का लावून त्यांना अभंग गायला लावले.

विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले.

संपूर्ण देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. लोकांनी बाहेर पडू नये असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, काहीजण विनाकारणच घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांना सुरुवातीला पोलिसी दंडुक्याचा प्रसादही मिळाला आहे.

पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी अनोखी शक्कल लढवली. शहरातील मुख्य ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना त्यांनी थांबवले. त्यानंतर रणजीत पाटील, अभिजित कांबळे या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कपाळावर बुक्का लावला. तर प्रसाद औटी यांनी त्यांना हरिपाठ आणि तुकोबांचे अभंग म्हटले आणि नियम मोडणाऱ्यांनाही म्हणण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी मिळून विठुरायाचा जयघोष केला.

करोना आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. पोलिसांनी लाठीचा वापर केला तरी लोक बाहेर पडतच आहेत. त्यामुळेच आता त्यांचे प्रबोधन करण्यात येत असल्याचे सांगत नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले आहे.