राज्यात फटाका बंदी – मंत्री राजेश टोपे

0
219

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – राज्यात फटाक्यांवर बंदी आणण्याचा मंत्रिमंडळात प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यावर कोरोनाचं महाभयंकर संकट घोंघावत आहे. त्याच पार्श्वभूमीवर फाटाक्यांना बंदी घालण्याची भुमिका आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी मांडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी “राज्यात कोरोनाचा संसर्ग अजून कमी झालेला नाही. त्यात आता दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढू शकतो. त्यामुळे दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी,” अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली होती.

“फटाकेमुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री आणि कॅबिनेटमध्येही मी याबाबत आग्रह धरणार आहे”, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. “फटाक्यांच्या धुरात टॉक्झिसिटी खूप असते. थंडीमुळे तो धूर वर जाऊ शकणार नाही. त्यामुळे श्वसनाला अधिक बाधा निर्माण होऊ शकते. यासंदर्भात अधिक काळजी घेतलेली बरी आहे, यासाठीच दिवाळीपूर्वीपर्यंत हा नियम लागू करण्याचा माझा आग्रह राहील. मृत्युदर कमी करण्यासाठीही महत्त्वाचे निर्णय घेतले”, असे राजेश टोपेंनी सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून फिव्हर सर्व्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान डॉ. प्रदीप व्यास, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डेथ ऑडीट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे, राज्य साथरोग नियंत्रण तक्ष समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते. यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी यावेळी चर्चा झाली. ज्या रुग्णालयांमध्ये मृत्यू दर अधिक आहे त्याठिकाणी रुग्णालयस्तरावरच डेथ ऑडीटी कमिटी नेमून शासनाला अहवाल देण्याचे यावेळी तज्ञांनी संगितले.

५०० लॅबच्या माध्यमातून चाचण्यांवर अधिक भर
राज्यात कोरोनाची दुसरी लाट शक्यतो येणार नाही मात्र संभाव्य लाटेसाठी खबरदारीची उपाययोजना करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. सध्या राज्यात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत त्यात खंड पडणार नसून त्याउलट अधिक प्रभावीपणे ५०० लॅबच्या माध्यमातून चाचण्यांवर अधिक भर दिला जाणार असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.

राज्यभरात फिव्हर सर्वेलन्स वाढविणार
थंडीमध्ये इन्फ्लुएन्झा सारखे आजार वाढतात. त्यामुळे तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून खासगी डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांचे लक्षणानुसार तातडीने चाचण्या करण्यासाठी प्राधान्य देण्याचे समितीने सुचविले आहे. त्यानुसार राज्यभरात फिव्हर सर्वेलन्स वाढविणार असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.

‘सुपर स्प्रेडर’ यांच्या चाचण्यांवर भर
राज्यभरात किराणा दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक, सार्वजनिक वाहतुकीतील कर्मचारी ज्यांचा लोकांशी कायम संपर्क येते अशा ‘सुपर स्प्रेडर’ यांच्या चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश क्षेत्रिय पातळीवरील यंत्रणेला देण्यात आले आहेत.

डॉक्टर्स, नर्स यांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम
लहान शहरांमधील रुग्णालयांमध्ये आयसीयूमधील डॉक्टर्स, नर्स यांची कमतरता लक्षात घेऊन तेथील कर्मचाऱ्यांना सिम्युलेशन लॅबच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेम्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय कायम
राज्यात सध्या कोरोनासाठी ज्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत तसेच जी सुविधा निर्माण करण्यात आली आहे ती कायम ठेऊन त्यात अजून वाढविण्यासाठी प्रयत्न करतानाच खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णयही कायम राहील. त्याचप्रमाणे टास्क फोर्सने जे आदर्श उपचार कार्यपद्धती तयारी करून दिली आहे त्यानुसार उपचार करण्याचे राजेश टोपे यांनी आवाहन केले आहे.

आगामी दिवाळी सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरे करण्याचे आवाहन आरोग्मयंत्र्यांनी केले आहे.
“कोरोनाचे संकट अजून दूर झालेले नाही. ज्यांना श्वसनाचे विकार आहेत, अशा लोकांना कोरोनाचा संसर्ग गंभीर होतो. दिवाळीमध्ये फटाक्यांच्या धुरामुळे अनेकांना श्वसनाचे विकार होतात, असे अनेक अहवाल प्रसिद्ध झाले आहेत.” “विशेषत: शोभेच्या दारुमुळे वायू प्रदूषण, धूर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अगोदरच काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या दिवाळीत कुठलेही फटाके, शोभेची दारु उडविण्यात बंदी करावी,” असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पत्रात लिहिलं होतं. फटाक्यांसोबतच शोभेच्या दारूमुळे वायू प्रदूषण होते. त्यामुळे शोभेची दारू उडवण्यास बंदी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.