राजस्थानमध्ये नोकरी मिळत नसल्याने चौघा तरुणांची आत्महत्या

0
593

अलवार, दि. २३ (पीसीबी) – राजस्थान येथील अलवार जिल्ह्यामध्ये नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून चार तरुणांनी ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास घडली.

मनोज मीना (वय २४), सत्यनारायणन मीना (वय २२), रितूराज मीना (वय १७) आणि अभिषेक मीना (वय १८) असे आत्महत्या केलेल्या चौघा तरुणांची नावे आहेत.

मयत तरुणांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या सुमारास मनोज, सत्यनारायणन, रितूराज आणि अभिषेक यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली तेव्हा त्यांचे दोन मित्र राहुल आणि संतोष हे देखील सोबत होते. मयत चौघेही नोकरी मिळत नसल्याने निराश होते. त्यांना शेती देखील जमत नव्हती. आपण ओझे म्हणून जगतोय, अशी भावना त्यांच्या मनात आली होती. त्या चौघांनी संतोष आणि राहुलला देखील आत्महत्या करणार का असे विचारले. पण त्या दोघांनी नकार दिला. त्या नंतर काही वेळातच चौघांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. अलवारमधील पोलीस अधीक्षक राजेंद्र सिंह अधिक तपास करत आहेत.