मुंबई, दि. २३ (पीसीबी) – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभ्रमणात सगळ्यांचेच रेकॉर्ड मोडले आहेत. अर्थात भगवान विष्णूचे ते अकरावे की बारावे असे अवतार आहेत. त्यामुळे त्यांना जगभरातील भक्तांना दर्शन देण्यासाठी भ्रमण करावे लागते. भारताशी अनेक देशांचे संबंध बरे नव्हते. ते दुरूस्त करण्यासाठी पंतप्रधानांना अशी जागतिक वणवण करावी लागते,’ असा टोला लगावतानाच ‘या जागतिक वणवणीवर आतापर्यंत १४ हजार कोटी रूपयांचा चुराडा झाला असून हे पैसे जनतेच्या तिजोरीतून उडवले असले तरी त्या बदल्यात भारताला काय मिळाले यावर खुली चर्चा व्हायला हवी’, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेशवारीवर आतापर्यंत १४ हजार कोटींचा खर्च झाला आहे. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. ‘मोदी यांच्या १४ हजार कोटींच्या जगभ्रमणात मिळवले काय, हा प्रश्नच आहे. ‘आजाद हिंद सरकार’ स्थापनेस ७५ वर्षे झाली, त्यानिमित्ताने मोदी यांनी लाल किल्ल्यावर पुन्हा तिरंगा फडकवला. मोदी त्यावेळी शूराचे शब्द बोलले, ‘भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांवर दुप्पट ताकदीने पलटवार करू.’ आम्ही पंतप्रधानांच्या भूमिकेचे स्वागत करीत आहोत. फक्त अमेरिकेच्या दबावाखाली येऊन ‘एफ-१६’ चा राफेल छापा सोदा करू नका. ट्रम्प प्रशासनाने दिलेल्या धमकीवर कसा पलटवार करणार?,’ असा सवालही यांनी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.