मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचं दुकान उघडलं पाहिजे – निलेश राणे

0
347

मुंबई, दि.२९(पीसीबी) – मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचं दुकान उघडलं पाहिजे, असं वक्तव्य भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केलं आहे.

औरंगाबादमध्ये सामूहिक नमाजासाठी एकत्र आलेल्या नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करून तीन कर्मचाऱ्यांना जखमी केलं. या घटनेवरून निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचं दुकान उघडलं पाहिजे. पोलिसांनी किती सहन करत राहावं??? काय मर्यादा आहे की नाही. गुन्हे झाले की दोन-तीन कलमं लावून विषय विसरायचा आणि राज्य सरकार आम्ही कार्यवाही केली सांगून मोकळे होतं, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान बिडकीन येथील औरंगाबाद-पैठण रोडवरील संभाजीनगर मार्गावर असणाऱ्या अमिरनगर-प्रकाश नगर येथे मुस्लिम समाजातील काही लोक धार्मिक स्थळी जमले होते. यासंदर्भातील माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील काही पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहचले आणि तेथील लोकांना समजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.