“मुंबई ‘नाईट लाईफ’ ला मंत्रीमंडळाची मंजुरी”

0
391

मुंबई,दि.२२(पीसीबी) – राज्य मंत्रिमंडळानं मुंबई मध्ये नाइट लाइफ सुरू करण्याच्या निर्णयाला आज मंजुरी दिली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईत २७ जानेवारीपासून नाइट लाइफ सुरू करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली.

“रोजगार निर्मिती आणि महसूल वाढवण्याबरोबर लोकांना २४ तास सेवा मिळावी या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. नाईट लाईफ म्हणजे केवळ पब आणि बार इतकंच नसेल. बार आणि पबसाठी महसूलचे निर्णय आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पब आणि बार पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, इतर हॉटेल्स, दुकाने आणि मॉल्स २४ तास सुरू राहतील. यात २४ तास दुकानं सुरू ठेवणे बंधनकारक नाही. हे प्रत्येकावर अवलंबून असेल,” असं पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले.

“नाइट लाइफ म्हणजे पब आणि बारच नसेल. पब आणि बार रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहिल. ज्यांनी जीआर वाचला नाही, त्यामुळे तेच असं बोलत आहेत, अशी टीका करतानाच या निर्णयामुळे पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही,” असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.