मावळ आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेचा घाम फोडला; दोन्ही मतदारसंघात पैशाच्या उधळणीवरच जय-पराजय ठरणार

0
636

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात सुरूवातीला शिवसेनेसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक आता चुरशीची झाली आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेच्या दोन्ही विद्यमान खासदारांना घाम फोडल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे दोन्ही खासदार विजयासाठी झुंजत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः शिरूर मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, आता तशी चिन्हे दिसत नाहीत. दुसरीकडे अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांनीही जोर लावल्यामुळे मावळ मतदारसंघ तिसऱ्यांदा राखणे शिवसेनेसाठी वाटते तेवढे सोपे नाही. आता प्रचाराचे शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत. शेवटच्या टप्प्यात पैशाची किती आणि कशी उधळण होते यावरच मावळ आणि शिरूर मतदारसंघात जय-पराजय ठरेल. तसेच दोन्ही मतदारसंघातील विजय हा निसटत्या मतांचाच असेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.