अहमदनगर, दि. ७ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपकडून महाजानादेश यात्रा तर शिवसेनेकडून जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. यावरून भाजप-सेना यांच्यात मुख्यमंत्री कोण व्हावा यासाठी वेगवेगळ्या यात्रा सुरु असल्याचे दिसते . मात्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठरवू द्या. महाराष्ट्र कोणाचीही जहागिरी नाही, असे मत राष्ट्रवादीचे शिरुर खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रा आज अहमदनगर येथे पोहोचली . यात्रेदरम्यान आयोजित सभेत अमोल कोल्हे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
गेल्या पाच वर्षात भाजप –शिवसेनेच्या युती सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे . या सरकारने जनतेसाठी काय काम केले? असा प्रश्न जनतेला पडला आहे. ‘पाच वर्षे कामे केली असती तर तुम्हाला यात्रा काढावी लागली नसती असा टोला लगावला. तसेच पुढे बोलताना छत्रपतींचे नाव घेवून सत्तेत आलेल्या शिवसेनेच्या खासदारांनी शिवरायांचे साधे नावही संसदेत घेतले नाही हे दुर्दैव आहे असे म्हणत शिवसेनेवर टीका केली.