मुंबई, दि. २६ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाले. या कारवाईचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हवाई दलाचे अभिनंदन केले आहे. भारतीय हवाई दलाने ज्या पद्धतीने अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले, त्या बद्दल मी मनापासून अभिनंदन करतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन भारतीय हवाई दलाचे अभिनंदन केले आहे. भारतीय हवाई दलाने ज्या पद्धतीने अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले, त्या बद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भारतीय हवाई दलाचे मनापासून अभिनंदन करतो, असे ट्विट राज यांनी केले आहे.
दरम्यान, पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे एअर स्ट्राइक केले. यात ३५० दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जात आहे. हवाई दलाच्या या एअर स्ट्राइकचे देशभरातील राजकीय पक्षांनी कौतुक केले आहे.