‘भारताला जो हरवेल तोच वर्ल्ड कप जिंकेल’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे मोठे विधान

0
767

मॅंचेस्टर, दि. २८ (पीसीबी) – भारतीय संघाने विश्वचषकातील साखळी सामन्यात गुरूवारी वेस्ट इंडिज संघाचा धावांनी १२५  धावांनी धुव्वा उडवला. यासोबतच भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. यंदाच्या वर्ल्ड कपमधील भारताचा हा सहा सामन्यांतील पाचवा विजय ठरला असून भारत हा एकमेव संघ अद्याप या स्पर्धेत अजिंक्य आहे. दरम्यान, विश्वचषकातील भारताच्या धडाकेबाज कामगिरीनंतर अनेक माजी दिग्गजांनी भारतच विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. पाकिस्तान, श्रीलंकेकडून झालेला धक्कादायक पराभव आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने मात दिल्यापासून इंग्लंडच्या माजी खेळाडूंचे सूर सोशल मीडियावर देखील बदललेले पहायला मिळत आहेत.

आतापर्यंत इंग्लंडच विजयाचा प्रबळ दावेदार आहे, आणि घरच्या मैदानावर विश्वचषक असल्याने परिस्थितीचा फायदा उचलत इंग्लंड विश्वचषक जिंकेल अशा फुशारक्या मारणारे खुद्द इंग्लंडचेच माजी खेळाडू आणि कर्णधार देखील आता भारतीय संघ विश्वचषक जिंकू शकतो असे म्हणतायेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने तर यापुढे जात एक विधान केले आहे. भारत विश्वचषक जिंकू शकतो असे थेट म्हणणे वॉनने टाळले मात्र, ‘जो संघ भारताला पराभूत करेल तोच संघ हा वर्ल्डकप जिंकेल’, असे ठाम विधान त्याने केले आहे. गुरूवारच्या सामन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवेल हे निश्चित झाले त्याचवेळेस मायकल वॉन याने भारतीय संघाला जो संघ पराभूत करेल तोच विश्वचषक जिंकेल, आणि या मताशी ठाम आहे असे विधान ट्विटरद्वारे केले आहे. ट्विटरद्वारे सातत्याने मायकल वॉन भारतीय संघावर आणि संघातील खेळाडूंवर निशाणा साधत असतो किंवा टीका करत असतो, त्यामुळे त्याने केलेल्या या ट्विटनंतर सोशल मीडिया युजर्सकडून त्याची चांगलीच खिल्ली देखील उडवली जात आहे.