भारतात पुढील सहा ते आठवड्यात करोनाची तिसरी लाट

0
296

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – भारतात पुढील सहा ते आठवड्यात करोनाची तिसरी लाट येणार असून ती टाळता येणं अशक्य असल्याचं एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. देशातील अनेक भागांमध्ये कडर निर्बंधांनंतर शिथीलता आणत अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना रणदीप गुलेरिया यांनी एनडीटीव्हीशी बोलताना हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं मोठं आव्हान असून कोव्हिशिल्डमधील अंतर वाढवणं त्यासाठी वाईट पर्याय नसल्याचंही सांगितलं आहे.

यावेळी त्यांनी डेल्टा प्लस विषाणूसंबंधी बोलताना विषाणूंच्या परिवर्तनाचा पुढील अभ्यास करण्यासाठी करोनाविराधातील लढाईत नव्याने रुपरेषा आखण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. “आपण अनलॉक करत असताना पुन्हा एकदा लोकांकडून करोनासंबंधित सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून आपण धडा घेतलेला दिसत नाही. पुन्हा एकदा गर्दी होत आहे, लोक एकत्र येत आहेत. राष्ट्रीय स्तरावर रुग्णसंख्या वाढण्यास काही वेळ लागेल. पण तिसरी लाट अपरिहार्य असून पुढील सहा ते आठवड्यात येऊ शकते…जास्त काळही लागू शकतो,” असं यावेळी रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी आपण गर्दी रोखण्यासाठी तसंच करोनासंबंधि सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यासंबंधी काय भूमिका घेतो यावर सगळं अवलंबून असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. देशातील पाच टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस मिळाले असून लसीकरण पूर्ण झालं आहे. वर्षअखेरपर्यंत १०८ कोटी लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य आहे. “लसीकरण हे मुख्य आव्हान आहे. नवी लाट तीन महिन्यांचा कालावधी घेऊ शकते, पण इतर गोष्टींवर अवलंबून असल्याने ही वेळमर्यादा कमीदेखील होऊ शकते. करोनासंबंधित नियमांसोबतच लक्ष ठेवणंही महत्वाचं आहे. गेल्यावेळी नवा विषाणू जो बाहेरुन आला आणि येथे विकसित झाला यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. हा विषाणू सतत बदलत राहणार आहे. हॉटस्पॉटच्या ठिकाणी आक्रमकपणे काम करण्याची गरज आहे,” असं रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.