मुंबई, दि. २१ (पीसीबी) – एक्झिट पोलने दाखवलेल्या जागापेक्षा अधिकच्या जागा भाजपला मिळतील, देशात पुन्हा भाजपचे सरकार येणार असून एनडीएला पूर्ण बहुमत मिळेल, असा अंदाज निवडणूक विश्लेषक आणि स्वराज्य इंडिया पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे. मात्र, या निवडणुकीच्या निकालानंतर देशात लोकशाही नसेल तर तानाशाही असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना यादव यांनी एक्झिट पोल आणि एकूण राजकीय परिस्थिती यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपसह काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
यादव पुढे म्हणाले की, या निवडणुकीनंतर देशातील संविधानिक व्यवस्था कोसळून जाईल. काँग्रेस हा भाजपला सक्षम पर्याय नाही. भविष्यातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही. काँग्रेस सर्वच आघाड्यावर अपयशी ठरली आहे. शेतकरी, बेरोजगारांसाठी काँग्रेस उभी राहिली नाही, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात भाजप- शिवसेनेचा वरचष्मा राहील. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला कमी जागा मिळतील, असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. ‘एक्झिट’ पोल ‘एक्झॅक्ट’ पोल नसतो. मात्र सर्वच पोल एकाच दिशेने जात आहेत. ‘एक्झिट’ पोल करताना त्यांनी अभ्यास केलेला असतो. त्यामुळे त्यात तथ्य असते, असेही त्यांनी सांगितले.