ईव्हीएममध्ये फेरफार केल्यास रक्ताचे पाट वाहतील – उपेंद्र कुशवाह

0
366

पाटणा, दि. २१ (पीसीबी) –  मतदान हे सर्वोच्च दान आहे. आपले जीवन आणि आपली प्रतिष्ठा जितकी महत्त्वाची आहे तितकेच लोकशाहीमध्ये मतदानाला महत्त्व आहे. त्यामुळे मतरक्षणासाठी गरज पडल्यास आम्ही शस्त्रे हातात घेऊन  रक्ताचे पाट वाहू, असा इशारा देऊन यासाठी सरकार आणि प्रशासनातील अधिकारी  जबाबदार राहतील, अशी  धमकी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (आयएलएसपी) नेते उपेंद्र कुशवाह यांनी दिली आहे.

बिहारमध्ये राजद कार्यकर्त्यांनी ईव्हीएमने भरलेली गाडी पकडली आहे. त्याबाबत विचारले असता कुशवाह यांनी केंद्र सरकार, बिहार सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. ईव्हीएममध्ये फेरफार होण्याची शक्यता व्यक्त करत अशाप्रकारे मतांची चोरी करून जिंकण्याचा विचार कुणी करत असेल तर त्यांनी वेळीच हा उद्योग बंद करावा.

अन्यथा जनतेत खदखदत असलेल्या असंतोषाचा स्फोट होईल. लोक शस्त्रे हाती घेतील. रस्त्यावर रक्ताचे पाट वाहतील. भविष्यात जी स्थिती उद्भवेल त्याला सरकार आणि प्रशासनातील अधिकारी जबाबदार  असतील,  असा इशारा कुशवाह यांनी दिला.