“भटक्या विमुक्तांच्या समाजाला किमान दोन वेळा तरी मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी”

0
256

बीड, दि.२७ (पीसीबी) : जे वंचित आहेत त्यांनाच वंचितांच्या वेदना माहिती आहेत. सध्या गृहीत धरले जात असल्याने ओबीसींना ताकद दाखवावी लागणार आहे. इतर समाजाला दहावेळा मुख्यमंत्री पदाची संधी दिली जातेय. भटक्या विमुक्तांच्या समाजाला किमान दोन वेळा तरी मुख्यमंत्रिपदाची संधी द्यावी, असं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

ओबीसी परिषदेच्या निमित्ताने विजय वडेट्टीवर बीडमध्ये आले होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ओबीसींची राजकीय आणि सामाजिक ताकद विषद केली. याचवेळी त्यांनी राजकीय महत्तवकांक्षा बोलून दाखवताना इतरांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाते पण आता वंचितांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली पाहिजे, अशी मागणी केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “जे वंचित आहेत त्यांनाच वंचितांच्या वेदना माहिती आहेत. सध्या गृहीत धरले जात असल्याने ओबीसींना ताकद दाखवावी लागणार आहे. इतर समाजाला दहा वेळा मुख्यमंत्री पदाची संधी दिली जातेय. भटक्या विमुक्तांच्या समाजाला किमान दोन वेळा तरी मुख्यमंत्रिपदाची संधी द्यावी. जेणेकरुन त्यांचे प्रश्न त्यांना सोडविता येईल” ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नावर लढण्यासाठी अनेक जण आहेत. मात्र मी फ्रंट फूटला खेळतोय, अशा शब्दात त्यांनी ओबीसी नेते पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या मेळाव्यातील अनुपस्थितीवर नाव न घेता टोला लगावला.

बीडमध्ये ओबीसी समाजाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रम पत्रिकेमध्ये पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचेही नाव होते. मात्र त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये ओबीसीचा मेळावा होत असताना देखील गैरहजेरी लावली. त्यामुळे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोघांचेही नाव न घेता क्रिकेटचं उदाहरण देत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीवरुन मिश्किल टोला लगावला. याच मेळाव्यात त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. भाजप नेते अधून मधून सरकार कोसळेल, अशी भविष्यवाणी करत असतात. नव्हे सरकार कोसळेल म्हणून त्यांनी देव पाण्यात ठेवलेत. भाजप नेते ज्योतिष्यांसारखी वक्तव्यं करतात. ज्योतिष्य कधीच खरं होत नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टोलेबाजी केली.