फटाके फोडण्याच्या वेळेत बदल करण्यास राज्यांना मुभा – सर्वोच्च न्यायालय

0
479

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, न्यायालयाने  हा आदेश शिथिल करत राज्यांना फटाके फोडण्याच्या वेळेत बदल करण्यास मुभा दिली आहे. परंतु फटाके फोडण्याचा कालावधी दिवसातून दोन तासांहून अधिक नसेल, असेही न्यायालयाने  स्पष्ट केले आहे.

तामिळनाडू, पुद्दुचेरी या राज्यात सकाळी दिवाळी साजरी केली जाते. त्यामुळे तामिळनाडूने याबाबत न्यायालयात धाव घेतली होती. तसेच हरित फटाक्यांचा वापर करण्याचा आदेश हा केवळ दिल्ली-एनसीआरसाठीच होता. उर्वरित भारतासाठी नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

तामिळनाडू सरकारने राज्यातील जनतेसाठी पहाटे ४.३० ते ६.३० दरम्यानही फटाके फोडण्याची परवानगी द्यावी, अशी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती. यावर जर राज्यांना हवे असेल, तर ते दोन तासांचा अवधी सकाळी एक तास आणि सायंकाळी एक तास असा विभागू शकतील, असे न्यायालयाने म्हटले.  तामिळनाडूत पारंपारिक पद्धतीने सकाळी दिवाळी साजरी केली जाते. तर उत्तर भारतात दिवाळी रात्री साजरी केली जाते.

दरम्यान,  २३ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना  दिवाळीत रात्री ८ ते १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी दिली होती.  ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतावेळी फक्त २० मिनिटेच फटाके फोडता येतील, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते.