पुस्तकांचा आणि लेखकांचा सन्मान व्हावा | जागतिक पुस्तक दिन

0
248

पुस्तकांचा आणि त्या लेखकांचा सन्मान व्हावा या निर्मळ भावनेतुन निर्माण झालेल्या या पुस्तक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💐

ज्यांनी ज्यांनी पुस्तकांचा आधार घेतला त्यांच्या त्यांच्या जीवनाचं “सोनं” झालं, लहानपणी आम्ही शाळेत कॉलेजला असताना शिक्षक नेहमीच म्हणायचे “वाचाल तरच वाचाल” पण कालांतराने याचा प्रत्येय पण येऊ लागला, दिवाळीच्या सुट्टी असु की उन्हाळ्याच्या सुट्ट्या लहानपणापासुन अकबर-बिरबल, रहस्यकथा, चाचा चौधरी कॉमिक्स, वर्तमानपत्रातील गोष्टी, कोडी सोडविण्याचा आणि त्यातील छान छान गोष्टीचे कात्रण काढुन ठेवण्याचा छंद खुप जोपासला. आणि तेव्हाच्या सर्वच मुलामुलींना पुस्तकांची आवड असायची, शाळेत नवीन पुस्तक मिळाली की इतका आनंद व्हायचा पुस्तक हातात घेतलं की ते उघडुन त्यांचा दिर्घ श्वासान सुगंध घ्यायचा त्याला मग आर्थिक बेतानं वर्तमानपत्राच्या पानांचे किंवा विकत घेऊन कव्हर लावायचो, सांगायच तात्पर्य एवढचं की तेव्हाच्या पिढीत आणि आताच्या पिढीत वाचन आणि पुस्तकांची दुनियादारी हवी तशी दिसत नाही. साहजिकच आता स्मार्ट फोन, थ्रीडी गेम आणि कार्टून चॅनेल्स यामुळे वाचनाकडे होत असलेलं दुर्लक्ष किंवा उदासिनता स्पष्ट दिसते.

जेवढं आपण वाचन करू अभ्यास करू, तेवढं ज्ञान आपण प्राप्त करून समाजाचं आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण करू शकतो हाच आदर्श आपले महापुरुष आपल्याला देऊन गेले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे यांनीही कित्येक भाषांचे अभ्यास करून वाचन केले, ग्रंथ लिहिले. दीनदलितांचे कैवारी, ज्यांनी माणसाला “माणुस” म्हणुन जगण्याचा समान हक्क आणि अधिकार दिला ते “थोर महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर” यांनी त्यांच्या कठीण काळात पुस्तकांना विशेष महत्व देत, “हे पुस्तक परत मिळेल न मिळेल” या भावनेतून त्या पुस्तकाची ओळ ना ओळ आत्मसात करून घेतली व शिक्षणाला व पुस्तकाला विशेष महत्व देत देशाला सर्वोच्च संविधान राज्य घटना आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर अर्पण केली, दिड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे जगातील थोर साहित्यिक मानले जातात, कथा कांदबऱ्या, चित्रपट, रहस्यकथा, प्रवासवर्णने लिहली, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा साता समुद्रापार रशियात पोहचवणारे आणि रशियन देशात अण्णाभाऊंचे धडे शिकवले जातात, त्यांचं सर्व साहित्य रशियन भाषेत उपलब्ध करून त्यांचे स्मारक तिकडे मोठया अभिमानाने उभा आहे, दिड दिवस शाळेत गेलेला माणुस “साहित्यरत्न व लोकशाहीर” फक्त पुस्तकाच्या आवडीने आणि शिकण्याच्या तीव्र इच्छेने होऊ शकतो हे ही आपण शिकण्याजोगे आहे.

पुस्तकाला जर आपण आयुष्यातला सर्वात चांगला मित्र बनवला तर पुस्तक पण आपल्याला नवीन दिशा दाखवतं, बऱ्याच जणांना वाचनाची लिखाणाची आवड असुन देखील कामाच्या व उद्योगधंद्याच्या व्यापामुळे जमत नाही पण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण पुस्तके जरूर वाचा..!

“पुस्तक” एकच अशी गोष्ट आहे जी आता लाईटवर चालत नाही, त्यामुळे टीव्ही, लॉपटॉप, मोबाईल लाईटविना बंद पडू शकतील तुमची साथ सोडू शकतील पण पुस्तकांचं असं नाही…!

#किशोरकाशिनाथहातागळे