नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – पुलवामा दहशतवादी हल्ला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आखलेला पूर्वनियोजित कट होता, असा धक्कादायक आरोप माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते अजीज कुरेशी यांनी केला आहे. कुरेशी यांच्या विधानामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
अजीज कुरेशी म्हणाले की, स्फोटकांनी भरलेल्या वाहनाला जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश मिळाला कसा ?’ जर मोदींना वाटत असेल की ४० सीआरपीएफ शहीद जवानांचा फायदा घेत ते निवडणूक जिंकतील तर त्यांना मतदार चोख उत्तर देतील, असा निशाणा त्यांनी साधला.
दरम्यान, काँग्रेस नेते बी के हरिप्रसाद यांनीही याआधी असेच वादग्रस्त विधान केले होते. पुलवामा दहशतवादी हल्ला मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यातील मॅच फिक्सिंग होती, असा आरोप त्यांनी केला होता. त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनीही पुलवामा हल्ला कट होता, असा आरोप करून मतांसाठी सीआरपीएफ जवानांचा बळी देण्यात आला, असे म्हटले होते.