पुण्यात ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार

0
203

पुणे, दि.18 (पीसीबी) : राज्यातील आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार अशा चर्चा सुरू असताना आता मात्र पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचे माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुका एकत्र लढवण्याचे आदेश नसून स्थानिक पातळीवरील राजकारण पाहून स्वतंत्र निवडणुक लढविण्याचे संकेत पक्ष श्रेष्ठीकडूनच देण्यात आले असल्याचे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले. यामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

आढळराव पाटील म्हणाले, आघाडीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूका लढवल्या जात असल्याच्या चर्चा आहेत. पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो की, तसा आपल्याला कोणताही आदेश वरिष्ठाकडून नाही. मी जेव्हा नेत्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, तुमचं स्थानिक राजकारण पाहून तुम्ही ठरवा. तुम्हाला वाटलं की, आघाडी करून फायदा होत असेल तर तुम्ही आघाडी करा. पण आपल्या तालुक्याचा विचार केला, तर तुम्हाला आमंत्रण द्यायला कोणी येणार नाही. घे ऊठ चल, आम्ही तुमच्या बरोबर आघाडी करायला तयार आहे. असा तर स्वभाव राष्ट्रवादी काँग्रेसचा नाहीच आणि म्हणून तुम्ही तुमचं स्वबळावर आपल्या ताकतीवर उभं राहायचे, आपल्या ताकतीवर लढायचे. हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, असे आढळराव पाटील यांनी सांगितलं.