पुढील ऑक्टोबरपर्यंतच फडणवीस मुख्यमंत्रिपदावर – प्रकाश आंबेडकर

0
474

पंढरपूर, दि. १२ (पीसीबी) – पुढील ऑक्टोबरपर्यंतच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदावर राहणार आहेत. तोपर्यंत त्यांना काय नाटके करायची आहेत, ती करू द्या. पुढच्या वेळी ते १०० टक्के मुख्यमंत्रीपदावर नसतील,’ असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर  यांनी म्हटले  आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

संभाजी भिडे यांना मिरज दंगलीच्या आरोपातून मुक्त केल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. त्यावर आंबेडकर म्हणाले की, ‘भिडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यांना दोषमुक्त करण्याचा आधिकार मुख्यमंत्र्याना नाही. आता त्यांना काय नाटके करायचीत ती करू द्या. पुढच्या वेळी आमचीच सत्ता येणार आहे. पुन्हा भिडेंना आत घालू,’ असे आंबेडकर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेसमधील नेते धर्मनिरपेक्ष आहेत, त्यामुळे  काँग्रेससाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत. काँग्रेस नेत्यांचे सतत फोन येत असतात. मात्र, आम्ही काँग्रेसवर विसंबून नाही,’ असे आंबेडकर म्हणाले. ‘काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता मठ-मंदिराना भेटी देणे सुरू  केल्याने ते सुद्धा  वेगळे नाहीत,’ असेही ते म्हणाले.