पिंपरीत होणार सामाजिक सलोखा आरक्षण परिषद, सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

0
118

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – महाराष्ट्रात विविध समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे.त्यासाठी विविध समाजाचे प्रतिनिधी,कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलने,उपोषण करीत आहेत.तसेच सरकार दरबारी निवेदने देऊन आरक्षणाची मागणी करत आहेत.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच काही मंत्री वेळ मारून नेण्यासाठी सरकारच्या वतीने आश्वासने देत आहेत.त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आरक्षण प्रश्नाने गंभीर वळण घेतले आहे.त्यामुळे जाती जातीत दुरावा आणि संभ्रम निर्माण होत आहे.महागाई, पाऊस पाणी,बेरोजगारी या समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिक तणावात आणि त्रस्त आहेत.

समतेचा आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या आणि शिवराय,शाहू,फुले, आंबेडकर,अण्णाभाऊंचा विचार पुढे नेणाऱ्या महाराष्ट्रात या परिस्थितीत सामाजिक सलोखा निर्माण करणे आवश्यक आहे. सर्व समाजास न्याय मिळावा कुणावरही अन्याय होऊ नये सर्वांच्या मागण्या,अडचणी समजून घ्याव्यात.सर्व जाती जातीमध्ये,धर्मांमध्ये सलोखा, सामाजिक ऐक्य निर्माण व्हावे. यासाठी पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक सलोखा आरक्षण परिषदेचे लवकरच आयोजन करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पिंपरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे शनिवारी (दि.१६) झालेल्या बैठकीत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींनी आपले विचार मांडले.यावेळी मानव कांबळे, प्रकाश जाधव,सतिश काळे, प्रताप गुरव,आनंदा कुदळे,देवेंद्र तायडे,मारुती भापकर,के.डी. वाघमारे,गुलामभाई शेख,विशाल जाधव,विश्वनाथ जगताप,प्रदीप पवार,पांडूरंग परचंडराव,बी.बी.शिंदे,रावसाहेब गंगाधरे, किरण खोत,शितल घरत,सुनीता शिंदे,अशोक सातपुते,संदिप मुटकुळे,चंद्रशेखर कणसे,ज्ञानेश्वर मलशेट्टी,ब्रम्हानंद जाधव,राहुल मदने,संतोष कदम, सुरेश भिसे,रजनीकांत क्षिरसागर आदी उपस्थित होते.नियोजित सामाजिक सलोखा आरक्षण परिषदेत एससी,एसटी, ओबीसी,मराठा,मुस्लिम,धनगर, समाजाचे वक्ते आप आपल्या समाजाच्या आरक्षण विषयक भूमिका स्पष्ट करणार आहेत.