पत्नीची काळजी घेतली नाही, देशाची काळजी काय घेणार? ममता बॅनर्जींचा मोदींना खोचक सवाल  

0
443

कोलकाता, दि. १६ (पीसीबी) – तुम्ही तुमच्या पत्नीची काळजी घेतली नाही. देशाची काळजी तुम्ही काय घेणार? असा खोचक सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांना  केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी आज (गुरूवार) पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच निवडणूक आयोगावरही टीकास्त्र सोडले. बॅनर्जी म्हणाल्या की, रोड शोदरम्यान हिंसाचार घडवून आणण्यासाठी भाजपवाल्यांनी बाहेरुन गुंड आणले होते. बाबरी मशीद पाडल्यानंतर जसा हिंसाचार झाला होता, तसाच हिंसाचार मंगळवारी झाला.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकात्यामधील रोड शोदरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये  हिंसाचार झाला. त्यामुळे निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकांचा प्रचार एक दिवस आधीच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरही हल्लाबोल केला.

दरम्यान अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचाराला ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीतील पराभव दिसत असल्यानेच ममता बॅनर्जींनी हिंसाचार घडवला असल्याचा आरोप अमित शाह यांनी केला आहे.