नोटाबंदीनंतर ५० लाख नोकऱ्या गेल्या; अझीम प्रेमजी विद्यापीठाचा अहवाल

0
612

बेंगळुरू, दि. १७  (पीसीबी) – गेल्या दोन वर्षांत जवळपास ५० लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘द स्टेट ऑफ वर्किंग इंडिया २०१९’च्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. बेंगळुरूतील अझीम प्रेमजी विद्यापीठानं हा अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यानुसार २०१६ ते २०१८ या कालावधीत ५० लाख लोकांनी नोकरी गमावली. नोव्हेंबर २०१६मध्ये मोदी सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बेरोजगारी वाढण्यास सुरुवात झाली. मात्र, नोकरीच्या संधी कमी झाल्याचा आणि नोटाबंदीचा थेट संबंध स्पष्ट होऊ शकला नाही, असंही अहवालात नमूद केलं आहे.

बेरोजगारीची कुऱ्हाड उच्चशिक्षित आणि कमी शिकलेल्या लोकांवरही पडली आहे. देशातील कामगार क्षेत्रावर आधारित हा अहवाल असून, दर चार महिन्यांनी अशा प्रकारचा सर्व्हे केला जातो. त्यात १.६ लाख कुटुंब आणि ५.२२ लाख लोकांना सहभागी करून घेतलं जातं. आताच्या अहवालानुसार, २०११ पासून बेरोजगारीत वेगानं वाढ होत आहे. २०१६नंतर उच्चशिक्षित आणि कमी शिकलेल्या लोकांनीही नोकऱ्या गमावल्या; तसंच रोजगाराच्या संधीही कमी झाल्या. पदवीधर महिलांपैकी १० टक्के महिला सध्या नोकरी करतात. तर ३४ टक्के महिला बेरोजगार आहेत. शहरातील २० ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांचं बेरोजगारीचं प्रमाण अधिक आहे.