निवृत्तीमहाराज इंदोरीकर, हाजिर हो…

0
230

नाशिक, दि. ३ (पीसीबी) : पुत्र प्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराज यांना पुढील महिन्यात 7 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश संगमनेर न्यायालयाने दिले आहेत. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची पहिली सुनावणी आज संगमनेर न्यायालयात झाली. मात्र आज केवळ समन्स बजावण्यात आला.

इंदोरीकर महाराज यांनी फेब्रुवारी महिन्यात पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत अनेक सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी इंदोरीकर महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी रंजना गवांदे यांच्या तक्रारीनंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टात PCPNDT कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर आज संगमनेर कोर्टात पहिली सुनावणी झाली. त्यामुळे आज न्यायालय काय आदेश देणार याकडे लक्ष लागलं होतं. मात्र आज फक्त त्यांना समन्स बजावण्याची ऑर्डर काढण्यात आली.

निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज काय बोलले होते?
‘स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टायमिंग हुकला की क्वॉलिटी खराब. पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.’

इंदोरीकरांनी मागितली होती माफी
अपत्यप्राप्तीसाठी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी वाद टोकाला गेल्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. इंदोरीकर महाराज यांनी पत्रक जाहीर करुन दिलगिरी व्यक्त केली होती. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं त्यांनी पत्रकात म्हटलं होतं. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटना, अंधश्रद्धा निर्मूलन व विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो व माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे ही सदिच्छा, असं त्यांनी म्हटलं होतं.