सांगली, दि. १० (पीसीबी) – काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा दर्जा खाली गेला होता. पण गेल्या ५ वर्षात राज्यातील फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारमुळे पुन्हा देशात महाराष्ट्राचा दबदबा वाढला आहे. ‘नरेंद्र-देवेंद्र’ या डबल इंजिनामुळे महाराष्ट्र देशात पुन्हा पहिल्या क्रमांकाचे राज्य होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (गुरूवार) येथे व्यक्त केला.
सांगलीच्या जतमध्ये प्रचार सभेत शहा बोलत होते. यावेळी शहा यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठविली.
यावेळी ते म्हणाले की, त्यावेळच्या केंद्रातील काँग्रेस सरकारने कायम राज्यातील मुख्यमंत्री बदलण्याचे काम केले. मात्र, तुम्ही फडणवीसांना निवडून दिले आणि मोदींनी त्यांना पाच वर्षे काम करण्याची संधी दिली. फडणवीसांसारखा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. जो दिवसरात्र जनतेसाठी काम करीत आहे. रात्रीच्या एक वाजता देखील कोणी त्यांच्याकडे गेल्यास ते त्यांच्या मदतीसाठी तत्पर असतात.