नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञा साध्वीवर अर्जुन कपूर भडकला

0
505

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, तो देशभक्त आहे आणि तो देशभक्तच राहील, असे वादग्रस्त विधान मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. या विधानावरुन भाजपावर टीकेची झोड उठली असतानाच अभिनेता अर्जुन कपूरनेही संताप व्यक्त केला आहे. ‘मतांसाठी प्रयत्न करत असताना लोकांना जबाबदारीचीही जाणीव राहिलेली नाही,’ अशी टीका अर्जुनने केली आहे.

‘अशा लोकांना संवेदनशील वक्तव्ये करून फक्त लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि हवामान बदल यावर कोणताच राजकीय नेता भाष्य करताना दिसत नाही. भूतकाळातल्याच घटना उकरून काढून त्यावर विधाने केली जात आहेत,’ असे अर्जुन म्हणाला. आजकाल एखाद्या राजकीय नेत्याने जागतिक तापमानवाढ आणि शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामाबद्दल भाष्य केले तर मला धक्काच बसेल असा उपरोधिक टोलाही त्याने लगावला.

गोडसे याला दहशतवादी म्हणणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपण कधीच साध्वी प्रज्ञाला मनापासून माफ करु शकणार नाही असे म्हटले आहे.