दुर्देवी: बुलडाण्यात हरवलेल्या मुलांचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू

0
494

बुलडाणा, दि. १६ (पीसीबी) – शहरातून सोमवारी दुपारी एक वाजल्यापासून गायब झालेली तीन लहान मुले बंद कारमध्ये सापडली आहेत. यात दोन मुलांचा गुदमरून मृत्यू झाला, तर तिसरी मुलगी सहर ही जिवंत सापडली आहे. हा प्रकार मध्यरात्री तीन वाजता समोर आला. सहर हिला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अंगणवाडीत गेलेल्या तीन बालकांचे बुलडाणा शहरातून अपहरण करण्यात आल्याची घटना सोमवारी १५ जुलैच्या दुपारी १ वाजेदरम्यान घडली होती.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून शहरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. मात्र, या बालकांचा थांगपत्ता लागl नव्हता. तर १६ जुलैच्या रात्रीपासून गुरु पौर्णिमा लागत असल्याने हे अपहरण नरबळीसाठी झाल्याची शक्यता वर्तविली जात होती. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

बुलडाणा शहरातील गौळीपुरा भागात राहणारे शेख हनीफ शेख हिरा यांचे दोन नातू व एक नात कुमारी सहर शेख हमीद (वय ४), शेख साहिल शेख जमील (वय ५) आणि शेख अजीम शेख समीर (वय ३) हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी जवळच्याच अंगणवाडी केंद्रात गेले होते. दुपारी बारावाजेपर्यंत तिघे घरी परत येणे अपेक्षित असताना एक वाजेपर्यंत तिघेही परतले नाही. त्यामुळे घरच्या मंडळींनी अंगणवाडी केंद्रात जाऊन पाहणी केली असता तेथे ही बालके आढळली नाहीत. यानंतर संपूर्ण शहरात या बालकांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते न मिळाल्याने संध्याकाळी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली.

तीनही बालकांचे अपहरण झाल्याची शक्यता असल्याने या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गौळीपुरा परिसरातील लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेराची मदत याकामी घेतली गेली होती. त्यात रात्रीपर्यंत कुठलेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नव्हते. तपासाच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी लगतचा परिसर तपासण्याचे ठरवले. यात नगरसेवक मोहम्मद अफसर यांना सोबत घेऊन प्रत्येक घराची तपासणी केली. त्यानंतर टिपू सुलतान चौका समोरील गवळीपुरा लागून असलेल्या एका घरासमोर उभ्या असलेल्या लाल कारजवळ जाऊन पोलिसांनी काचे मधून आत पाहण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर कारमध्ये पोलिसांना काही तरी आढळले.यावेळी पोलिसांनी काचेला ठोकले असता मुलगी सहर उठुन बसली व तिने पोलिसांना आत असल्याचे भासवले मग पोलिसांनी तातडीने कारचे दरवाजे उघडले. त्यात दोन मुले ही बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. दरम्यान तिघांनाही उपचारा करीता जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यातील शेख साहिल शेख जमील आणि शेख अजीम शेख समीर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.