दारु पिऊन वाहन चालवत असल्यास गाडीचं इंजिन सुरुच होणार नाही; असे तंत्रज्ञान भारतात आणण्याचा गडकरींचा विचार

0
755

नवी दिल्ली, दि.९ (पीसीबी) –  दारु पिऊन वाहन चालवत असल्यास गाडीचं इंजिन सुरुच होणार नाही, अशा प्रकारंच भन्नाट तंत्रज्ञान वाहनात बसवण्याचा विचार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

राज्यसभेत बोलत असताना त्यांनी याची माहिती दिली.

वाहन चालकाने सीटबेल्ट न घातल्यास पोलिस नियंत्रण कक्षाला त्याची माहिती आपोआप मिळेल, अशी व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचंही गडकरींनी सांगितले. यमुना एक्स्प्रेस महामार्गावर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यसभेत विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना गडकरी यांनी या नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.

दारु पिऊन बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळेही अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच अशा प्रकारचे तंत्रज्ञान वाहनामध्ये बसविण्याचा विचार आहे.

चालकाने सीट बेल्ट न लावल्यास पोलिस नियंत्रण कक्षाला त्याची आपोआप माहिती मिळेल,अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

दरम्यान वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजनांचा विचार करत असल्याचंही गडकरी म्हणाले. तसेच टायरमध्ये रबरसोबतच सिलिकॉन आणि नायट्रोजन वायूचा वापर कऱण्याचा प्रस्ताव आहे. अमेरिकेसह प्रगत देशांमध्ये हा वापर केला जातोय. या दोन्हीमुळे टायर थंड होतो. त्यामुळे वाहनानं कितीही अंतर प्रवास केला, तरी टायर फुटण्याची शक्यता कमी असते म्हणूनच टायरमध्ये रबरसोबतच सिलिकॉन आणि नायट्रोजन वायूचा प्रस्ताव आहे.