दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नये; विजय मल्ल्यावर उध्दव ठाकरेंची टीका   

0
551

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपण भेटलो हे मद्यसम्राट विजय मल्ल्या यांने इतक्या वर्षांनंतर न्यायालयात सांगितले. काँग्रेसला या भेटीची कल्पना होती, मग ते इतकी वर्षे लपवून का ठेवले, की काँग्रेसचा आणि मल्ल्याचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे? असा सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करून मल्ल्या एक नंबरचा खोटारडा आहे. दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नये,असेही त्यांनी म्हटले आहे.

अरुण जेटली आणि विजय मल्ल्या भेटीवरुन सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यात आता उद्धव ठाकरे यांनी अरुण जेटलींची पाठराखण केली आहे. एकमेकांचे पाय कापण्याचे प्रयोग दिल्लीत सुरू आहेत.२०१९ ची ही पूर्वतयारी आहे. जे नकोत त्यांना आताच छाटा. त्यात सुक्याबरोबर ओलेही जळत आहे. जेटली यांच्याबाबत नेमके तेच घडताना दिसत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मल्ल्याच्या जेटलींना भेटल्याच्या विधानावर इतकी खळबळ उडायचे कारण काय? अशा प्रकारच्या भेटी होऊ शकतात व हे काँग्रेसला माहीत असायला हवे. ज्या पक्षात मनमोहन सिंग यांच्यासारखे जोरदार अर्थतज्ञ आहेत त्यांचा सल्ला तरी काँग्रेसने घ्यायला हवा होता, असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले आहे.