‘तर भाजपवाले एक दिवस महात्मा गांधींना हटवून सावरकरांना राष्ट्रपिता करतील’

0
415

नवी दिल्ली, दि.१३ (पीसीबी) : महात्मा गांधी यांच्या सूचनेनुसारच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांकडे दया याचिका दाखल केली होती, असं वक्तव्य देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलंय. त्यांच्या वक्तव्यानंतर देशभरातल्या राजकीय, सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राजनाथ सिंह यांचा समाचार घेताना, जर इथून पुढे अशीच इतिसाहाची मोडतोड झाली तर भाजपवाले महात्मा गांधींच्या जागी सावरकरांना राष्ट्रपिता करतील, असा हल्लाबोल केलाय. उदय माहुरकर आणि चिरायू पंडीत यांनी लिहिलेल्या वीर सावरकर- द मॅन व्हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना राजनाथ सिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. महात्मा गांधींच्या सांगण्यावरुन अंदमान तुरुंगात असताना त्यांनी इंग्रजांकडे दयेसाठी याचिका केली होती, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह यांनी केलेल्या दाव्यावर ओवेसींनी कडाडून हल्ला चढवला.

सध्या इतिहासाची मोडतोड करणं सुरु आहे. पण अशीच जर इतिहासाची मोडतोड केली तर भाजपवाले एक दिवस महात्मा गांधींना हटवून सावरकरांना राष्ट्रपिता करतील ज्यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप लावण्यात आला होता आणि ज्यांना जस्टिस जीवन लाल कपूर यांच्या चौकशीत दोषी ठरविण्यात आलं होतं, असं ट्विट करत ओवेसींनी राजनाथ सिंहावर निशाणा साधलाय. राष्ट्रीय नायकांच्या कार्याबद्दल वादविवाद होऊ शकतात, परंतु हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत म्हणून वीर सावरकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांचा अपमान करणं इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही, असं ठणकावून सांगताना महात्मा गांधींच्या सांगण्यावरुन अंदमान तुरुंगात असताना त्यांनी इंग्रजांकडे दयेसाठी याचिका केली होती, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. विशिष्ट विचारसरणीचे लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नको नको ते खोटं पसरवतात. पण वीर सावरकरांचं योगदान अमुल्य आहे. इथून पुढे त्यांची बदनामी सहन केली जाणार नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले. उदय माहुरकर आणि चिरायू पंडीत यांनी लिहिलेल्या वीर सावरकर- द मॅन व्हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राजनाथ सिंग बोलत होते.

“सावरकरांसंबंधी आतापर्यंत खूप खोटे बोललं गेलंय. त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे अनेक वेळा अनेकांनी सांगितलंय. परंतु त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी या याचिका दाखल केल्या नाहीत. सर्वसाधारणपणे कुठल्याही कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. विशेष म्हणजे तुम्ही दया याचिका दाखल करा, असं महात्मा गांधींनीच सावकरकरांना सांगितलं होतं. गांधींच्या सूचनेवरूनच त्यांनी दया याचिका दाखल केली होती आणि महात्मा गांधींनी सावरकरांना तुरुंगातून मुक्त करण्याचं इंग्रजांना आवाहन केले होते. आम्ही ज्या प्रकारे शांततेच्या मार्गाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत, त्याच मार्गाने सावरकर लढतील असं गांधींजींनी इंग्रजांना सांगितलं होतं”, असंही राजनाथ सिंह पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात म्हणाले.

राजनाथ सिंह म्हणाले की, “वीर सावरकर एक महान स्वातंत्र्य सेनानी होते, अशा परिस्थितीत विचारसरणीच्या चष्म्यातून पाहून त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांचा अपमान करणे क्षम्य नाही. वीर सावरकर एक महान नायक होते, आहेत आणि भविष्यातही राहतील. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांची इच्छाशक्ती किती प्रबळ होती, याचा अंदाज अनेक प्रसंगावरुन आला.ब्रिटिशांनी त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावली, पण ते मागे हटले नाहीत.”