‘….तर उपाययोजना करता आल्या असत्या. पंरतू दुर्दैवाने तेही झालं नाही’; दरेकर सरकारवर बरसले

0
231

मुंबई, दि.२२ (पीसीबी) : राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोकणात अनेक शहरं पाण्याखाली गेली आहेत. चिपळूणमध्ये २००५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. चिपळूणमध्ये घरं, बाजारपेठेत पाणी शिरलं असून दोन बोटींच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुुर करण्यात आलं आहे. याशिवाय रायगड, ठाणे येथेही पावसाने धुमाकूळ घातला आहे. या स्थितीवरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकार टीकास्त्र सोडलं आहे. प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रवीण दरेकर टीका करत म्हणाले कि, “या पावसामुळे पूर्णपणे कोकण उद्ध्वस्त झालं आहे. सांगली, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. गेल्या दहा दिवसांपासून आम्ही ओरडून सांगत आहोत, की मुंबईची तुंबई झाली. पूर्णपणे मुंबई विस्कळीत झाली आहे. दरडी कोसळून लोकं त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडली आहेत. आता तरी जागं व्हा आणि पूर्वनियोजन करा. दुर्दैवाने कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी पूर्वनियोजन झालं नाही. त्यामुळे कोकणाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला. शहरं पाण्याखाली आली आहेत. महाड शहरात ७ फूट पाणी आहे. चिपळूण, संगमेश्वर सगळ्या कोकणात आज पावसाने पूर्णपणे हैदोस घातला आहे. प्रशासकीय यंत्रणा अत्यंत तोकडी पडली आहे.”

“पूरग्रस्त नागरिकांना स्थलांतरीत करण्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था केली नाही, आता शोधायला निघाले आहेत. आता तातडीची मदत हवी आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागणार आहे. कपड्याची व्यवस्था करावी लागणार आहे. युद्धपातळीवर त्यांना याची आवश्यकता आहे. एनडीआरएफच्या टीम अजून तिथे पोहोचल्या नव्हत्या. तौते, निसर्ग वादळ झालं त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं होतं. एक टीम तिथे कार्यरत ठेवा. महाड, चिपळूणला ठेवा. तासभराच्या अंतरावर जर एनडीआरएफच्या टीम असतील, तर उपाययोजना करायला सोपं पडलं असतं. पंरतू दुर्दैवाने तेही झालं नाही. अजूनही एनडीआरएफच्या टीमला तिथे बोलवण्याचं काम सुरु आहे.” असं सांगत त्यांनी संताप व्यक्त केला. हवामान खात्यानं मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज आहे. आधी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, मात्र नंतर रेड अलर्ट देण्यात आला. मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड आणि विदर्भातील काही ठिकाणीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे