टोळक्याच्या हल्ल्यात तरुणाचा खून

0
303

पिंपरी, दि.11 (पीसीबी) : मित्राला मारहाण केल्याच्या कारणावरून आठ जणांच्या टोळक्‍याने एका तरुणावर कोयत्याने वार करीत खूनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास लिंक रोडवरील पत्राशेड येथे घडली. जखमी तरूणाचा उपचारादम्यान शनिवारी (दि. ११) मृत्यू झाला.

करण महादेव पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अभिषेक संजय गायकवाड (वय 19, रा. पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड) यांनी बुधवारी (दि. 8) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आबाशा ऊर्फ पृथ्वीराज कांबळे, आदित्य भोसले आणि त्याचे सहा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी अभिषेक गायकवाड हे आपले मित्रांसोबत पत्राशेड परिसरात गप्पा मारत होते. त्यांचा मित्र करण पवार हा त्यांच्याकडे गप्पा मारण्यासाठी येत होता. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी “तू अमर चव्हाणच्या मित्राला मारतोस काय, आज तुला जिवंत सोडणार नाही, आज तुला मारूनच टाकतो,’ असे म्हणत आरोपींनी करण पवार याच्यावर कोयता, लोखंडी रॉड, दगड आणि काचेच्या बाटलीने हल्ला केला. शनिवारी उपचारादरम्यान करण पवार याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम याबाबत अधिक तपास करीत आहेत